राजकोट : रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असलेल्या रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर निवडकर्त्यांनी सलग तिसऱ्यांदा दुर्लक्ष केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतही युवा खेळाडूंनाच संधी देण्यात आली.


श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत या दोघांना विश्रांती देण्यात आल्याचं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटलं होतं. मात्र ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवड न होणं हे दोघांकडेही दुर्लक्ष केल्याचे संकेत मानले जात आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या तीन एक वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सलामीवीर शिखर धवनचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. मात्र, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाला संघातून पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला.

न्यूझीलंडविरुद्ध निवड न झाल्यानंतर जाडेजाची बॅट तळपली. त्याने दुहेरी शतक ठोकून निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सौराष्ट्रकडून खेळताना जाडेजाने 201 धावा केल्या. सौराष्ट्र विरुद्ध जम्मू काश्मीर सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये उपहारापर्यंत सौराष्ट्रची धावसंख्या 563-7 अशी होती.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड न झाल्यापासून आर. अश्विनही टीम इंडियापासून दूर आहे. अश्विनने यावर्षी अखेरचा वन डे सामना जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी त्याला संधी देण्यात आली नाही.