मुंबईः टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा मनमिळावू स्वभावाचा व्यक्ती असून त्याचं कोणाशीही वैयक्तिक कसलं वैर नाही, असा खुलासा भारतीय निवड समितीचे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. संदीप पाटील यांनी 'माझा कट्टा'वर मनमोकळ्या गप्पा मारल्या.


धोनीने गंभीर आणि युवराजवर अन्याय केला का?

धोनीने टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याच्यावर अन्याय केला का, त्याला संधी का देण्यात आली नाही, असा प्रश्न संदीप पाटील यांना विचारण्यात आला. मात्र यामध्ये कसलंही तथ्य नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.

युवराजला बाहेर बसवण्यात धोनीचा कसलाही हात नाही. त्याचे प्रत्येकाशी वैयक्तीक संबंध चांगले आहेत. युवराजला अनेकदा संधी देण्यात आली. मात्र त्याला स्वतःला सिद्ध करता आलं नाही, असं संदीप पाटील यांनी सांगितलं.

प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी अशी आशा असते. मात्र संघात केवळ 15 खेळाडूच निवडता येतात. त्यामुळे चांगलं प्रदर्शन असूनही काही खेळाडूंना संधी देण्यात येत नाही, अशी खंत संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

रैना, जाडेजा, आश्विनला नेहमी संधी का मिळते?

धोनीकडून नेहमीच सुरेश रैना, रवींद्र जाडेजा आणि आश्विन यांना पसंती दिली जाते, अशी सतत चर्चा होते. यावरही संदीप पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. धोनीने आतापर्यंत कोणताही खेळाडू संघात घेण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी निवड समितीवर दबाव आणला नाही, असं स्पष्ट स्पष्टीकरण संदीप पाटील यांनी दिलं.

कर्णधाराचा काही खेळाडूंवर विश्वास असतो, त्यामुळे त्यांना संघात स्थान द्यावच लागतं. कारण मैदानात खेळाडूंसोबत कर्णधाराला उतरायचं असतं, असं मतही संदीप पाटील यांनी व्यक्त केलं.

धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती का घेतली?

ऑस्ट्रेलिया कसोटी दौऱ्यात भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी झाली. संघासोबतच आपलं योगदान कमी पडत असल्याचं पाहत धोनीने कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

कसोटीतून निवृत्तीचा धोनीचा हा स्वतःचा निर्णय होता आणि त्याने तो अचानक घेतला होता. त्यामुळे सर्वांनाच धक्का देणारा निर्णय होता, असं संदीप पाटील यांनी सांगितलं.