मुंबई : भारताची फुलराणी सायना नेहवालचं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतलं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं. त्यामुळं सायनाला महिला एकेरीच्या कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.


जपानच्या नोझोमी ओकुहारानं सायनाचं कडवं आव्हान 12-21, 21-17, 21-10 असं मोडून काढून, अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळं सायना आणि पी. व्ही. सिंधू या दोन भारतीय खेळाडूंमध्येच जागतिक बॅडमिंटनचा अंतिम सामना पाहण्याचं भारतीय क्रीडारसिकांचं स्वप्न भंगलं आहे.

सायनानं यंदा कांस्यपदकाची कमाई करुन जागतिक बॅडमिंटनमध्ये दुसऱ्या पदकाची नोंद केली. 2015 साली जाकार्तामध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनानं महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. पण कॅरोलिना मरिनकडून झालेल्या पराभवामुळं तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.

दरम्यान, 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सायनाच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे उचल खाल्ली होती. त्यामुळे तिला दुखापतग्रस्त गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्या दुखापतीतून सावरुन सायनानं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मारलेली धडक वाखाणण्याजोगी असल्याची प्रतिक्रिया जाणकारांकडून व्यक्त होत आहे.