मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यात आठ वर्षांनी पुन्हा एकदा मैत्री झाली आहे. माजी क्रिकेटर विनोद कांबळीने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना हा खुलासा केला आहे. "आमच्यात आता सगळं आलबेल आहे. त्यामुळे मी फारच खूश आहे. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि बोललो," असं कांबळीने सांगितलं.


45 वर्षीय कांबळी म्हणाला की, "जे काही घडलं ते आमच्यात होतं. आता मी आमच्या मैत्रीसाठी अतिशय आनंदी आहे."

मुंबईत सोमवारी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या 'डेमोक्रसी XI : द ग्रेट इंडियन क्रिकेट स्टोरी' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने केवळ एकमेकांना मिठीच मारली नाही तर बातचीतही केली.

https://twitter.com/circleofcricket/status/922704304875569152

मैत्रीत दुरावा का?
"मी आणि सचिन अतिशय जवळचे मित्र आहोत. तो आणखी बरंच काही करु शकला असता, पण क्रिकेटमध्ये परतण्यासाठी सचिनने मला मदत केली नाही," असा आरोप विनोद कांबळीने जुलै 2009 मध्ये एका टीव्ही शोमध्ये केला होता. त्यानंतर बालपणीच्या या मित्रांमध्ये दुरावा आला होता.

निवृत्तीच्या भाषणात कांबळीचा उल्लेख टाळला
कांबळीचं हे विधान सचिन तेंडुलकरच्या फारच जिव्हारी लागलं. 2013 मध्ये 200 वा कसोटी सामना खेळल्यानंतर वानखेडे स्टेडियमवरील निवृत्तीच्या भाषणात, सचिनने सगळ्यांची नावं घेतली, मात्र विनोद कांबळीचा उल्लेख टाळला.

नाबाद 664 धावांची पार्टनरशिप
सचिन आणि कांबळी एकत्र शिकले. इतकंच नाही तर दोघांचे प्रशिक्षकही एकच होते, ते म्हणजे रमाकांत आचरेकर. हे दोघेही मुंबई आणि टीम इंडियासाठी एकत्र खेळले. शालेय क्रिकेट स्पर्धेत या दोघांनी नाबाद 664 धावांच्या पार्टनरशिपचा विक्रम रचला होता, जो बरीच वर्ष कायम होता.