मुंबई : उद्या होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर सट्टेबाजार तेजीत आला आहे. विजयासाठी सट्टेबाजांची भारताला पसंती असून या मॅचवर तब्बल 400 कोटींचा सट्टा लावला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने इंग्लंडमध्ये सुरु असून, उद्या यातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत आहे. दिवसरात्र होणाऱ्या या सामन्यासाठी तब्बल 400 कोटींचा सट्टा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सट्टेबाजांकडून भारतावर 50 पैशांचा सट्टा लावण्यात येत आहे. म्हणजे जर भारतावर तुम्ही एक रुपया लावला आणि भारत जिंकला, तर 1 रुपया 50 पैसे मिळणार आहेत. तर पाकिस्तानवर 2 रुपयांचा सट्टा लावण्यात येत आहे. म्हणजे पाकिस्तानवर जर 1 रुपया लावला आणि पाकिस्तान जिंकला तर 3 रुपये मिळणार आहेत.

केवळ पाकिस्तानसोबतची मॅचच नव्हे, तर चॅम्पियन्स ट्रॉफीही भारतानंच जिंकावी यासाठी मोठा सट्टा लावण्यात येत आहे. भारतानंतर सट्टेबाजांनी इंग्लंडला पसंती दिली आहे.

दरम्यान सट्टेबाजांना गजाआड करण्याचं आव्हान तपास यंत्रणेसमोर असणार आहे.