रिओ दी जनैरो : रिओ पॅरालम्पिकमध्ये उंच उडी प्रकारात मरियप्पन थांगावेलूने सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला आहे. भारतानं तब्बल 12 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवलं आहे. तर वरुण सिंह भाटीने याच प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे.


थांगावेलूने 1.89 मीटर उडी मारत सुवर्ण तर भाटीने 1.86 मीटर उडी मारुन कांस्यपदक पटकावलं. दुसरीकडे भाला फेक प्रकारात संदीपचं कांस्यपदक थोडक्यात हुकलं. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

पॅरालम्पिकच्या इतिहासातील भारताचं हे तिसरं सुवर्णपदक आहे. याआधी स्विमर मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मधल्या हेजवर्ग आणि भालाफेकपटू देव झाजरिया यांनी 2004च्या अथेन्स पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्णपदकावर नाव कोरंल होतं. त्यांच्यानंतर सुवर्णपदक जिंकणारा थांगावेलू हा तिसरा भारतीय ठरला आहे.

थांगावेलू आणि भाटीच्या यशानंतर आतापर्यंतच्या सर्व पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या एकूण पदकांची संख्या 10 झाली आहे. यात 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे.

रिओ ऑलिम्पिकचा समारोपाच्या दोन दिवस आधी पॅरालिम्पिकला सुरुवात झाली होती. 18 सप्टेंबरपर्यंत पॅरालिंपिक्स खेळाचं आयोजन असेल.

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली असली, तरी पॅरालम्पिक गेम्समध्ये दुसऱ्याच दिवशी दोन पदकाची कमाई केल्याने भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

पॅरालिम्पिक्सची सुरुवात 1948 मध्ये झाली होती. त्रिशा जॉर्न ही पॅरालिम्पिक्समधील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. तिने एकूण 55 पदकं जिकंली असून त्यात 41 सुवर्णपदकांचा समावेश आहे.