मुंबई: रविचंद्रन अश्विननं मुंबई कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून 12 विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला.


अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात पाच विकेट्स काढण्याची कामगिरी बजावण्याची ही 24 वी वेळ ठरली. तर एकाच कसोटीत 10 किंवा दहापेक्षा अधिक विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवण्याची अश्विनची ही सातवी वेळ आहे.

केवळ अनिल कुंबळेनंच अश्विनपेक्षा जास्तवेळा म्हणजे आठवेळा एकाच कसोटीत दहा किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स काढल्या होत्या.

अश्विननं इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील चार कसोटींमध्ये मिळून आतापर्यंत 27 विकेट्स काढल्या आहेत. एकाच कसोटी मालिकेत 25 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स काढण्याची अश्विनची ही चौथी वेळ असून, त्यानं याबाबतीत कपिलदेवच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

इंग्लंडवर एक डाव 36 धावांनी मात

टीम इंडियानं इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी धुव्वा उडवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. डावानं पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला 231 धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 195 धावांतच आटोपला.

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं दुसऱ्या डावात सहा विकेट्स काढल्या आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संबंधित बातमी


वानखेडेवर तिरंगा, इंग्लंडवर 1 डाव 36 धावांनी मात