नवी दिल्ली : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत संघाचे माजी संचालक रवी शास्त्री दाखल झाले आहेत. रवी शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समिती अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुलाखत घेणार आहे.

वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर फलंदाज फिल सिमंस यांनीही टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. फिल सिमंस यांनी वेस्ट इंडिज संघाचे प्रशिक्षक म्हणून तर आयर्लंड आणि अफगाणिस्तान संघाचे सल्लागार म्हणूनही काम केलं आहे.

यापूर्वी टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, व्यंकटेश प्रसाद, रिचर्ड पायबस आणि लालचंद राजपूत यांनीही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.

ऑगस्ट 2014 ते जून 2016 या काळात टीम इंडियाचे संचालक म्हणून काम केलेल्या रवी शास्त्री यांचे संघातील खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. याचाच फायदा त्यांना होईल, असं बोललं जात आहे. मात्र अंतिम निर्णय क्रिकेट सल्लागार समितीच घेणार आहे.

रवी शास्त्री यांनी गेल्या वर्षीही अर्ज केला होता. मात्र त्यावेळी अनिल कुंबळे यांना संधी देण्यात आली होती. अनिल कुंबळेंच्या मार्गदर्शनाखालीच टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. शिवाय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही धडक मारली.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशी असलेल्या मतभेदांमुळे अनिल कुंबळेंनी प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दिला. 2014 मध्ये रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर पराभवाची धूळ चारली होती. तर 2015 मध्ये विश्वचषकही खेळला आणि 2016 मध्ये टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. तर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकाही जिंकली होती.