'त्या' अपयशानं माझ्यात मोठा बदल घडवला: आर. अश्विन
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 09:11 PM (IST)
मुंबई: टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही अश्विननं दोन्ही सामन्यांत मिळून 14 विकेट्स काढल्या आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. '2013 सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील अपयशानं माझ्यात मोठा बदल घडवून आणला.' असं अश्विननं विस्डेनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्या दौऱ्यावर अश्विननं पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 36 षटकं टाकली होती. मात्र त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. त्यानंतर अश्विनवर बरीच टीका झाली होती. त्याबाबत बोलताना अश्विन म्हणाला की, 'झालेल्या टीकेनं मला स्वतःच्या गोलंदाजीविषयी विचार करायला भाग पाडलं. आता प्रत्येक कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा माझा प्रयत्न असतो, मला मॅचविनरच व्हायचं असतं.' असं अश्विन म्हणाला.