जसवीर सिंहची जबरदस्त झुंज, जयपूर-बंगळुरु सामना टाय
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2016 05:07 PM (IST)

मुंबई : जसवीर सिंहने अखेरच्या मिनिटात जबरदस्त झुंज दिल्याने जयपूर पिंक पँथर्सला बंगळुरु बुल्सविरुद्धचा सामना 28-28 असा बरोबरीत रोखता आला. प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात टाय झालेला हा दुसरा सामना ठरला. खरंतर बंगळुरु बुल्सचा संघ अखेरच्या मिनिटापर्यंत 28-25 असा तीन गुणांनी आघाडीवर होता. पण जसविरने दोन्ही चढायांमध्ये प्रत्येकी एक गुण आणून बंगळुरुची आघाडी 28-27 अशी एका गुणावर आणली. मग बंगळुरु बुल्सच्या अखेरच्या चढाईत रोहित कुमारला पकडून जयपूर पिंक पँथर्सने सामना 28-28 असा बरोबरीत सोडला. जयपूरसाठी जसविर सिंहने सर्वाधिक नऊ गुणांची कमाई केली. तर राजेश नरवालने सहा गुण वसूल करुन जयपूरच्या विजयाला हातभार लावला. बंगळुरु बुल्सकडून रोहित कुमारने सहा गुणांची कमाई केली. प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत जयपूर पिंक पँथर्स नऊ गुणांसह तिसऱ्या, तर बंगळुरु बुल्स आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत.