मुंबई: मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉचा रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीसाठी मुंबईच्या संघात समावेश झाला आहे. मुंबई आणि तामिळनाडू संघांमधला हा सामना एक जानेवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार असून, त्यासाठी मुंबईचा संघ जाहीर झाला आहे.


मुंबईच्या संघात केवळ एकच बदल म्हणजे सलामीवीर केविन डी अल्मेडाऐवजी पृथ्वी शॉचा समावेश झाला आहे. मुंबईचा नेहमीचा सलामीवीर अखिल हेरवाडकर तसंच शुभम रंजने दुखापतग्रस्त असून, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईचे दिग्गज फलंदाजही रणजी सामन्यात खेळू शकणार नसल्यानं पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे.

पृथ्वीनं नुकतंच भारताला एकोणीस वर्षांखालील वयोगटाचा आशिया चषक जिंकून देण्यात महत्वाचं योगदान दिलं होतं. त्यामुळंच पृथ्वीला मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान देण्यात आल्याचं मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी स्पष्ट केलं आहे.