नागपूर : विराट कोहलीच्या टीम इंडियाने नागपूर वन डेत ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली. या संपूर्ण मालिकेत शानदार कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कौतुक केलं.


हार्दिक पंड्याला इंदूर वन डेत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्याचा निर्णय मास्ट्ररस्ट्रोक ठरला. तो जगातील कोणत्याही मैदानात चौकार आणि षटकार ठोकू शकतो, असं रवी शास्त्री म्हणाले. रवी शास्त्री यांच्या सांगण्यावरुनच पंड्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. त्याने चौथ्या क्रमांकावर खेळताना 78 धावा केल्या.

पंड्या एक स्फोटक खेळाडू आहे. फिरकीपटूंविरोधात तो अधिक आक्रमक खेळतो. फिरकीपटूंविरोधात खेळणारा त्याच्यासारखा खेळाडू अजून पाहिला नाही. युवराज सिंह त्याच्या सुरुवातीच्या काळात असाच आक्रमक होता. हे दोघं जगातील कोणत्याही मैदानावर चौकार आणि षटकार ठोकू शकतात, असं रवी शास्त्री म्हणाले.

नागपूर वन डेत 243 धावांचा पाठलाग करणं हा सर्वोत्कृष्ट प्रयत्न होता. कारण नागपूरच्या खेळपट्टीवर धावा काढणं कठीण आहे. खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. हिटमॅनची (रोहित शर्मा) फलंदाजी पाहण्यासारखी होती, असंही रवी शास्त्री म्हणाले.