या सामन्यानंतर आपण पुढचा विश्वचषक खेळणार नसल्याचं टीम इंडियाची कर्णधार मिताली राजनं स्पष्ट केलं आहे. सामना संपल्यानंतर मिताली म्हणाली की, 'हा माझा शेवटचा विश्वचषक होता. पुढच्या विश्वचषक संघात मी नसेन.' दरम्यान, असं असलं तरी मितालीनं अद्याप तिच्या निवृत्तीबाबत किंवा कर्णधारपद सोडण्याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.
विश्वचषकातील अंतिम सामन्यातील पराभवाबाबत बोलताना मिताली म्हणाली की, 'सामन्यात महत्त्वाच्या वेळी संघ दबावात आला आणि मागोमाग विकेट गमावल्या. त्यामुळेच आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.'
पण यावेळी कर्णधार मिताली राजनं भारतीय संघाचं कौतुकही केलं. 'माझा संघाचा मला अभिमान वाटतो. संघानं या विश्वचषकात चांगली कामगिरी केली. कोणत्याही संघासाठी आमच्या विरुद्धचा सामना सोपा नव्हता. तसंच यावेळशी मितालीनं झुलन गोस्वामीचंही आवर्जून कौतुक केलं. 'ती प्रत्येक वेळेस सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करते.' असंही मिताली म्हणाली.
मिताली राजनं 1999 साली भारतीय संघात पदार्पण केलं होतं. 2004 साली तिच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2005 आणि 2017 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचले. पुढील विश्वचषक 2021 साली न्यूझीलंडमध्ये होणार आहे.
मितालीनं 185 वनडे सामन्यात 51.87च्या सरासरीनं 6173 धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या: