वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या दौऱ्यातल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचा न्यूझीलंडने 80 धावांनी धुव्वा उडवला आहे. उभय संघात तीन टी20 सामन्यांचा मालिका खेळवण्यात येत आहे. हा सामना जिंकत न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.


या सामन्यात सलामीवीर कॉलिन मुनरो आणि टीम सिफर्ट यांनी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर 220 धावांचं आव्हान उभं केलं. मात्र भारतीय फलंदाजांना ते आव्हानही पेलवलं नाही. महेंद्रसिंग धोनी आणि कृणाल पंड्याने सातव्या विकेटसाठी रचलेल्या 52 धावांच्या भागिदारीने भारतीय फलंदाजीची लाज राखण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातलं. त्यामुळे या सामन्यात भारताचा संपूर्ण डाव 139 धावांत आटोपला.

तत्पूर्वी ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय साजरा केला होता. भारताने ही मालिका 4-1 ने खिशात घातली होती.