मुंबई : टीम इंडियाच्या तेरा कसोटी सामन्यांच्या मोसमात भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी फलंदाज ठरलेल्या मुरली विजयनं एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. या मोसमात आपण उजव्या मनगटाचं फ्रॅक्चर घेऊन खेळल्याचं त्यानं सांगितलं.

विजयच्या याच दुखापतग्रस्त मनगटावर नुकतीच लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून सावरण्यासाठी सध्या विश्रांती घेत असलेल्या विजयनं आपल्या दुखापतीचं वास्तव मीडियासमोर आणलं.

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बंगळुरु कसोटीला मुकावं लागलं होतं. पण विजयनं उजव्या मनगटाच्या फ्रॅक्चरची पर्वा केली नाही. ते फ्रॅक्चर घेऊनच आपण अख्ख्या मोसमात खेळल्याचं त्यानं सांगितलं.

वैयक्तिक हितापेक्षा संघहित लक्षात घेऊनच विजयनं तो धोका स्वीकारला खरा, पण त्याच्यासमोरचं आव्हान खूप कठीण होतं. उजव्या मनगटाची दुखापत बळावू नये म्हणून त्याला मनमोकळी फलंदाजी करता येत नव्हती. त्याला काही फटके खेळणं टाळावं लागलं. विजयनं त्या परिस्थितीशी संघर्ष करुन अख्ख्या मोसमात 36.71 च्या सरासरीनं 771 धावा फटकावल्या.