रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने विजय हजारे ट्रॉफीत झारखंडकडून खेळण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनी विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये खेळणार असल्याची घोषणा केली होती.


यामुळे सीनिअर खेळाडू आणि निवड समिती यांच्यामध्ये संवादाचा अभाव असल्याचं समोर आलं आहे. खेळाडू आपले निर्णय स्वत:च घेत असल्याचंही समोर आलं आहे.

धोनी गेल्या दोन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात धोनीकडून खेळण्याची अपेक्षा होती. मात्र आज झारखंडचे मुख्य प्रशिक्षक राजीव कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषतेत धोनी क्वार्टर फायनल सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं.

झारखंडचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, "या महत्त्वाच्या सामन्यात संघात सामील होणं योग्य होणार नाही, असं धोनीला वाटत आहे. तसेच झारखंडचा संघ चांगलं प्रदर्शन करत असताना संघाचं संतुलन बिघडायला नको, असं मत धोनीचं आहे."

प्रसाद यांनी धोनीच्या खेळण्याची घोषणा करण्याआधी धोनीना कळवलं होतं की नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं की, "एमएसके प्रसाद धोनीशी संपर्क कसे साधतात हे मला जाणून घ्यायचं आहे."

या संपूर्ण प्रकारानंतर वरिष्ठ खेळाडू आणि निवड समितीत समन्वयाचा अभाव असल्याचंही स्पष्ट झालं आहे.