मुंबई : 2019 चा विश्वचषक पाहता युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनी यांची भारतीय संघातील भूमिका काय, याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं मत टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केलं आहे.


निवड समिती आणि व्यवस्थापनाने याबाबत निर्णय घेतला पाहिजे, असं राहुल द्रविडने एएसपीएनशी बोलताना सांगितलं. चॅम्पियन्स ट्रॉफीत चार आणि पाच क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या युवराज आणि धोनीच्या भूमिकेविषयी द्रविडला विचारण्यात आलं होतं.

भारतीय क्रिकेटचं भवितव्य म्हणून ते (निवड समिती) काही विचार करत आहेत का? पुढच्या काही वर्षांमध्ये या दोघांची (युवराज, धोनी) संघात भूमिका काय आहे? दोघांनाही संघात जागा आहे का? किंवा एखाद्यालाही संघात जागा आहे का?, असा सवाल द्रविडने केला आहे.

वर्ष किंवा सहा महिन्यात तुम्हाला (निवड समिती आणि व्यवस्थापन) पुनर्मुल्यांकन करण्याची इच्छा आहे का? या दोन खेळाडूंना संधी देण्यापूर्वी सध्या उपलब्ध असलेल्या कौशल्यवान खेळाडूंकडे पाहण्याची आणि त्यांची कामगिरी पाहण्याची इच्छा आहे का, असा सवालही द्रविडने केला.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजला रवाना झाली आहे. या मालिकेतला पहिला वन डे शुक्रवारी खेळवला जाणार आहे. या मालिकेत युवा खेळाडूंना अंतिम 11 मध्ये जास्तीत जास्त संधी मिळावी, अशी इच्छा द्रविडने व्यक्त केली.