T20 World Cup 2024, Hardik Pandya : आयपीएलच्या रनधुमाळीनंतर टी 20 विश्वचषकाच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. जून महिन्यात टी 20 विश्वचषकाची रनधुमाळी सुरु होईल. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरच टीम इंडियाची निवड होणार आहे.सध्या मुंबईची धुरा संभाळणाऱ्या हार्दिक पांड्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हार्दिक पांड्याला टी 20 विश्वचषकात संघात घ्यायला हवं का? याचीच चर्चा जोरदार सुरु आहे. हार्दिक पांड्याला विश्वचषकात निवडलं जाण्याची शक्यता कमीच आहे. याबाबत आपण जाणून घेणार आहोत. 


हार्दिक पांड्या सध्या मुंबई इंडियन्सची धुरा संभाळत आहे. पण हार्दिक पांड्याला आतापर्यंत चाहत्यांकडून कोणताही सपोर्ट मिळालेला नाही. रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेऊन हार्दिककडे धुरा दिल्यामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यावेळी हार्दिक पांड्याला चाहत्यांकडून हूटिंग केलं जात आहे. वानखेडे स्टेडियमवरही हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याला टी 20 विश्वचषकात स्थान द्यावं का? याची सोशल मीडियामध्ये आणि क्रिकेट एक्स्पर्टमध्ये चर्चा सुरु आहे. काही क्रीडा तज्ज्ञांनी हार्दिक पांड्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 


जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याला संघात स्थान द्यावं की नाही? याबाबत क्रिकेट एक्सपर्ट्स आणि दिग्गज खेळाडूंमध्ये मतमतांतरे आहेत. आगामी विश्वचषका पाहता हार्दिक पांड्याचा आयपीएलमधील फॉर्म पाहिला जाईल. तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो? याकडे निवड समितीचं बारकाईनं लक्ष असेल. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. हार्दिक पांड्याला आतापर्यंत 129 धावा करता आल्या. आरसीबीविरोधात हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी केली, त्यानं 6 चेंडूमध्ये 21 धावांचा पाऊस पाडला. पण गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्याला अद्याप करिश्मा दाखवला आला नाही. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे काही सामन्यात गोलंदाजी करु शकला नाही.


विश्वचषकात हार्दिक पांड्या का नको ? 


मागील काही दिवसांपासून हार्दिक पांड्याला दुखापतीने ग्रासलं आहे. दुखापतीपासून वाचण्यासाठी हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसल्याचं अनेकदा पाहिलेय. गोलंदाजी न टाकून हार्दिक पांड्या वर्कलोड मॅनेज करतो. गोलंदाजी न केल्यामुळे हार्दिक पांड्या पूर्णपणे अष्टपैलू खेळाडूप्रमाणे कामगिरी करु शकत नाही. आयपीएल 2024 मधील पाच सामन्यात हार्दिक पांड्याने फक्त 8 षटकं गोलंदाजी केली असून त्याला फक्त एक विकेट घेता आली. हार्दिक पांड्याने यादरम्यान 11.13 प्रतिषटक धावा खर्च केल्या. 


हार्दिक पांड्याला 2023 वनडे विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो सहा महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यानं एकही आतंरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आयपीएलद्वारे त्यानं क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले आहे. आयपीएलमध्येही आतापर्यंत हार्दिक पांड्याला अष्टपैलू कामगिरी करता आली नाही. आयपीएलनंतर भारतीय संघ विश्वचषकात सहभागी होणार आहे. आशा स्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणेही हार्दिक पांड्याची विश्वचषकात निवड न करण्याचं कारण ठरु शकतं. त्याशिवाय दुखापत हे सर्वात मोठं कारण असेल. विश्वचषकात भारतीय संघाला हार्दिक पांड्या पूर्णपणे फीट असलेला हवा आहे. हार्दिक पांड्याकडून गोलंदाजी आणि फलंदाजीतील योगदान हवं असेल. पण तो पूर्णपणे फीट नसेल तर कदाचीत हार्दिक पांड्याला विश्वचषकात स्थान मिळणार नाही.