IPL 2022 : आयपीएलमध्ये (IPL 2022) सर्वच सामने अत्यंत चुरशीचे सुरु आहेत. अशामध्ये प्रत्येक सामन्यात काही खास गोष्टी समोर येत असून दमदार खेळासह काही वेळा ड्रामा देखील पाहायला मिळत आहे. कधी खेळाडूंमध्ये वाद होत आहे, तर कधी खेळाडू पंचावर भडकताना दिसत आहे. अशातच आयपीएलच्या 34 व्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानात पाहायला मिळाला होता. पंचाच्या निर्णयावर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) भडकल्याचं यावेळी पाहायला मिळालं होतं. दरम्यान या घटनेनंतर अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून आता श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.


महेलाच्या मते, ''सध्या उपलब्ध असणाऱ्या सर्व तांत्रिक सोयींचा योग्य वापर होणं गरजेचं आहे. त्याद्वारेच मैदानावरील पंच आणि व्हिडीओ पंच यांच्यात योग्य समन्वय होणंही गरजेचं असून त्यासाठी नियमांमध्ये कोणते बदल करण्याची गरज असल्याच ते करायला हवे, असंही जयवर्धने म्हणाला आहे.'' दरम्यान स्वत: एक कोच असल्याने त्यादिवशी दिल्लीचे सहाय्यक कोच प्रवीण आमरे यांच्या सामना सुरु असताना मैदानावर जाण्याबाबतही महेलाने प्रतिक्रिया दिली. आमरे यांचे हे वागणे खेळ भावनेला धरुन नसल्याचे महेलाने म्हटले आहे. तसंच या साऱ्याचा आता आमरे आणि पंत या दोघांना पश्चाताप होत असेल असंही तो म्हणाला.


त्या दिवशी नेमकं काय घडलं?


राजस्थान-दिल्ली सामन्यातील अखेरच्या षटकात दिल्लीच्या संघाला विजयासाठी 6 चेंडूत 36 धावा करायच्या होत्या. दरम्यान, मैदतान उपस्थित असलेल्या दिल्लीचा तडाखेबाज फलंदाजरोव्हमन पॉवेलनं पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारून दिल्लीच्या आशा उंचावल्या. महत्वाचं म्हणजे, ओबेड मॅकॉयनं टाकलेला तिसरा चेंडू फूल टॉस होता. या चेंडूला दिल्लीच्या संघानं नो-बॉल देण्याची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. पंचांच्या निर्णयावर कर्णधार ऋषभ पंतनं नाराजी व्यक्त केली. तसेच दिल्लीच्या फलंदाजाला मैदानाबाहेर येण्याचा इशारा देखील केला होता.


हे ही वाचा -