Lucknow Super Giants vs Mumbai Indians : लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2025 मध्ये आपला दुसरा विजय सनसनाटी पद्धतीने नोंदवला आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या घरच्या मैदानावर एकाना स्टेडियमवर खेळत हंगामातील त्यांच्या चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. शार्दुल ठाकूर आणि आवेश खान यांनी शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौने मुंबईला 204 धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखले. 

सूर्यकुमार यादव नडला, पण एकटा पडला

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खुपच म्हणजे खुपच खराब झाली. मुंबईने 17 धावांवर 2 विकेट गमावल्या. प्रथम, इंग्लिश खेळाडू विल जॅक्सला (5) आकाश दीपने बाद केले. त्यानंतर दुसरा सलामीवीर रायन रिकेल्टनला (10) शार्दुल ठाकूरने माघारी पाठवले. त्यानंतर दोन विकेट पडल्यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी मिळून डावाला गती दिली. नमन आणि सूर्यकुमार यांनी तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. नमन धीर 24 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावा काढून बाद झाला. नमनला फिरकी गोलंदाज दिग्वेश सिंग राठीने बोल्ड केले.

नमन धीर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि 'इम्पॅक्ट प्लेयर' तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकारासह 67 धावा केल्या. आवेश खानने सूर्यकुमार यादवला बाद करून ही भागीदारी मोडली. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईला तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याकडून आशा होत्या. 

हार्दिकचा अतिआत्मविश्वास संघाला घेऊन बुडाला

मुंबई इंडियन्सना शेवटच्या 2 षटकांत जिंकण्यासाठी 29 धावा करायच्या होत्या. हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा क्रीजवर होते. त्यामुळे 29 धावांचे हे लक्ष्य गाठणे पूर्णपणे शक्य वाटत होते नव्हते. पण घडलं वेगळेच 19 व्या षटकात शार्दुल ठाकूरने एलएसजीसाठी सामना फिरवला. या षटकात त्याने फक्त 7 धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात आवेश खानला 21 धावा वाचवायच्या होत्या. पांड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, पण पुढच्याच चेंडूंवर त्याने जोरदार पुनरागमन केले आणि लखनौचा 12 धावांनी विजय निश्चित केला.

मिचेल मार्श नावचं वादळ, पण कर्णधार पंत फेल  

प्रथम फलंदाजी करताना एलएसजीला धमाकेदार सुरुवात मिळाली, कारण मैदानात मिचेल मार्श नावचं वादळ आले होते.  मार्शने 31 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 60 धावा केल्या. विघ्नेश पुथूरने त्याला आऊट करून लखनौ सुपर जायंट्सला पहिला धक्का दिला. यानंतर, लखनौने आणखी दोन विकेट लवकर गमावल्या. कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि दोन धावा काढून बाद झाला. तर, निकोलस पूरनने 12 धावा केल्या. तथापि, मार्करामने खंबीरपणे उभे राहून आपले अर्धशतक पूर्ण केले. मार्करामही 38 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 53 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच वेळी, आयुष बदोनीने 19 चेंडूत 30 धावांची खेळी केली.

डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकांमध्ये आपली ताकद दाखवली आणि लखनौचा धावसंख्या 200 च्या पुढे नेली. दरम्यान, हार्दिकला शेवटच्या षटकात हॅटट्रिक घेण्याची संधी होती पण तो हुकला. हार्दिकने 20 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मिलरला आऊट केले. मिलर 14 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 27 धावा काढून बाद झाला. पुढच्याच चेंडूवर हार्दिकने आकाश दीपला खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक व्यतिरिक्त, मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार आणि विघ्नेश पुथूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हार्दिक पांड्याने इतिहास रचला

हार्दिक पांड्याने इतिहास रचला आहे. त्याने त्याच्या 10 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकने त्याच्या 140 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 72 विकेट्स घेतल्या आहेत. लखनौविरुद्धच्या सामन्यात त्याने एडन मार्क्रम, निकोलस पूरन, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर आणि आकाशदीप यांच्या विकेट घेतल्या. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.