T 20 World Cup : आयपीएलचा रनसंग्राम संपल्यानंतर जूनमध्ये टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) महाकुंभाला सुरुवात होणार आहे. दोन आठवड्यामध्ये टीम इंडियाच्या चमूची निवड करण्यात येणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांच्यामध्ये नुकतीच मुंबईमध्ये (Mumbai) बैठक झाली. या बैठकीमध्ये टी 20 विश्वचषकासंदर्भात सखोल चर्चा झाली. टी 20 विश्वचषकात टीम इंडियासोबत कोणते दोन विकेटकीपर जाणार? याबाबत चर्चा सुरु आहे. ऋषभ पंत, दिनेश कार्तिकसह सहा विकेटकीपरच्या कामगिरीवर चर्चा झाल्याचं समजतेय. कोणत्या सहा विकेटकीपरमध्ये रस्सीखेच सुरु आहे, त्यांची आयपीएलमधील कामगिरी कशी आहे? हे पाहूयात..


दिनेश कार्तिक - 


यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिक याच्याकडून विस्फोटक फलंदाजी केली जात आहे. आरसीबीसाठी दिनेस कार्तिक फिनिशरचा रोल परफेक्टपणे पार पाडत आहे. दिनेश कार्तिक यानं यादंच्या हंगामात  दोन अर्धशतकं ठोकली आहेत. अखेरच्या 4 षटकांमध्ये दिनेश कार्तिकच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. मैदानाच्या कोणत्याही बाजूला तो फटके मारु शकतो. दिनेश कार्तिकने यंदाच्या हंगामात सात सामन्यातील सहा डावात 226  धावांचा पाऊस पाडला आहे.  दिनेश कार्तिकने 6 डावामध्ये 18 षटकार आणि 16 चौकार लगावले आहेत. 


संजू सॅमसन - 


प्रत्येक विश्वचषकावेळी संजू सॅमसन याचं नाव टीम इंडियासाठी चर्चेत असते. यंदाच्या विश्वचषकासाठीही संजूच्या नावावर चर्चा सुरु आहे. संजू सॅमसन यंदा आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात आहे. संजू सॅमसन यानं सात डावात 276 धावा केल्या आहेत. संजू सॅमसन यानं 155 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. संजू सॅमसन यानं यंदा तीन अर्धशतकं ठोकली आहे. संजूने 27 चौकार आणि 11 षटकार ठोकले आहेत. 


ईशान किशन - 


छोटा पॅक बडा धमाका.. ईशान किशन यानं यंदाच्या आयपीएलमध्ये वादळी फलंदाजी केली आहे. त्यानं 6 सामन्यात 179 च्या स्ट्राईक रेटने 184 धावा केल्या आहेत. त्यानं एक अर्धशतक ठोकले आहे. ईशान किशन यानं 13 षटकार आणि 18 चौकार लगावले आहेत. टी 20 विश्वचषकासाठी ईशान किशन याचीही चर्चा आहे. पण बीसीसीआयसोबत झालेल्या वादानंतर त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह आहे. 


केएल राहुल - 


टी 20 विश्वचषकासाठी विकेटकीपर म्हणून केएल राहुल याच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. केएल राहुल मधल्या फळीमध्ये आणि सलामीला फलंदाजी करु शकतो. त्याशिवाय विकेटच्या मागेही तो तरबेज आहे. भारतात झालेल्या विश्वचषकात केएल राहुल यानं विकेटकीपर म्हणून काम पाहिले होतं. यंदाच्या विश्वचषकात त्याला स्थान मिळतेय का? हे पाहावं लागेल. 


ऋषभ पंत - 


दुखापतीनंतर ऋषभ पंत यानं क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले आहे. पंत दीड वर्षे क्रिकेटपासून दूर होता. कमबॅकनंतर पहिल्या दोन सामन्यात पंतला सूर गवसला नव्हता. पण त्यानंतर पंत शानदार फॉर्मात आहे. पंतने 158 च्या स्ट्राईक रेटनं धावांचा पाऊस पाडला आहे. पंतने सहा डावामध्ये 194 धावा केल्या आहेत. पंतने दोन अर्धशतकेही ठोकली आहे. पंतने यंदाच्या हंगामात 11 षटकार आणि 16 चौकार ठोकले आहेत. 


जितेश शर्मा -


जितेश शर्मा याला यंदाच्या हंगामात लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जितेश शर्मा याला 6 सामन्यात फक्त 106 धावा करता आल्यात. त्यानं 131 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. जितेश शर्मा यानं सहा सामन्यात सात षटकार आणि पाच चौकार लगावले आहेत. टी 20 विश्वचषकासाठी जितेश शर्माचे नावही चर्चेत आहेत.