IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) संघ अद्याप प्लेऑफच्या शर्यतीत जर-तरच्या पेचात फसला आहे.  आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी (Royal Challengers Bengaluru Playoffs Scenario) चेन्नईचा पराभव करावाच लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे. यंदाच्या हंगामातील आरसीबीचा अखेरचा सामना चेन्नईविरोधात (RCB vs CSK) 18 मे रोजी होणार आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केला होता. चेन्नईविरोधात आरसीबीचा अखेरचा सामना 18 मे रोजी पार पडणार आहे. या दिवशी आरसीबीचा विजय निश्चित मानला जातोय. त्यामागे कारणही तसेच आहे. 18 मे रोजी विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोच.. त्याशिवाय 18 मे रोजी आरसीबीचा आतापर्यंत पराभव झाला नाही. 18 रोजी झालेल्या प्रत्येक सामन्यात आरसीबीनं विजय मिळवलाय. 


विराट कोहली अन् 18 मे - 


18 मे म्हटलं की विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने 18 मे रोजी धावांचा पाऊस पाडला आहे.  आयपीएलच्या 16 हंगामात विराट कोहली 18 मे रोजी चार सामने खेळलाय. या सामन्यात त्याने 98.7 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा जमवल्या आहेत. आयपीएलमध्ये 18 मे रोजी विराट कोहलीने दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकले आहे. विराट कोहलीने 18 रोजी खेळलेल्या 4 सामन्यात 296 धावांचा पाऊस पाडलाय. 18 मे 2023 रोजी विराट कोहलीने हैदराबादविरोधात शतकी खेळी केली होती. त्याने 63 चेंडूमध्ये 100 धावांचा पाऊस पाडला होता. त्याआधीही त्यानं 18 मे रोजी शतक झळकावलेय. चेन्नईविरोधात आता 18 मे रोजी विराट कोहलीच्या कामगिरीकडे नजरा खिळल्या आहेत. 






18 मे आणि आरसीबी -


आयपीएलच्या इतिहासात आरसीबीनं 18 मे रोजी कधीच पराभव पाहिला नाही. 2013 आणि 2014 मध्ये 18 मे रोजी आरसीबीने चेन्नईचा पराभव केला होता. त्यानंतर 2016 मध्ये आरसीबीने पंजाब किंग्सचा दारुण पराभव केला होता. या सामन्यात विराट कोहलीने 50 चेंडूत 113 धावांची वादळी खेळी केली होती. 18 मे 2023 रोजी आरसीबीने हैदराबादचा पराभव केला होता. या सामन्यात विराटने शतक ठोकले होते. आता चेन्नईविरोधात आरसीबीचा सामना 18 मे 2024 रोजी होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? हे येणारा काळच सांगेल. 



आरसीबीचं प्लेऑफचं समीकरण  Royal Challengers Bengaluru Playoffs Scenario


आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये जोरदार कमबॅक केले. लागोपाठ पाच सामन्यात विजय मिळवत आरसीबीने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.  आरसीबीचे 13 सामन्यात 12 गुण झाले आहेत, ते सध्या पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला चेन्नईविरोधात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल. 


चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबाद आणि लखनौच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे.