Mumbai vs Vidarbha Final, Ranji Trophy Day 2 : मुंबईनं विदर्भाविरुद्धच्या रणजी करंडक फायनलवर आज दुसऱ्या दिवशीच आपली पकड घट्ट केली. या सामन्यात मुंबईनं दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात दोन बाद 141 धावांची मजल मारली आहे. त्यामुळं या सामन्यात मुंबईची एकूण आघाडी 260  धावांची झाली आहे. रणजी चषकाच्या फायनलमध्ये शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे यांनी चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात शार्दूल ठाकूरनं 75 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय एक विकेटही घेतली होती. तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे यानं अर्धशतक ठोकलेय. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर फॉर्मात परतल्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात आनंदाचं वातावरण आहे. 


वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणे 58 आणि अष्टपैलू मुशीर खान 51 धावांवर खेळत होता. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची अभेद्य भागीदारी रचली. अजिंक्यनं 109 चेंडूंमधली नाबाद 58 धावांची खेळी चार चौकार आणि एका षटकारानं सजवली. मुंबईच्या कर्णधाराचं यंदाच्या रणजी मोसमातलं हे केवळ दुसरं अर्धशतक ठरलं. मुशीर खानच्या 135 चेंडूंमधल्या नाबाद 51 धावांच्या खेळीला तीन चौकारांचा साज होता. त्याआधी, मुंबईनं विदर्भाला अवघ्या 105 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 119 धावांची मोठी आघाडी घेतली. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शम्स मुलानी आणि तनुष कोटियननं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं.


अजिंक्यने डाव सावरला - 


विदर्भाला 105 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईल 119 धावांची आघाडी मिळाली. पण दुसऱ्या डावात मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवानी स्वस्तात माघारी परतले. विदर्भाचा संघ सामन्यात कमबॅक करेल असेच सर्वांना वाटत होते. पण कर्णधार अजिंक्य रहाणे यानं मुशीरला हाताशी धरत खडूस फलंदाजी केली. दोघांनी नाबाद 107 धावांची भागिदारी केली.  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे 58 आणि मुशीर 51 धावांवर नाबाद होते. 






42 व्या जेतेपदाकडे मुंबईची वाटचाल - 


रणजी चषकाच्या फायनलवर मुंबईने वर्चस्व मिळावलं आहे. रणजी चषकाच्या इतिहासात मुंबई 48 वा फायनल सामना खेळत आहे. मुंबईने आतापर्यंत 41 वेळा रणजी चषकावर नाव कोरलं आहे. आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने  42 व्या जेतेपदाकडे वाटचाल केली आहे. दुसरीकडे विदर्भाला फक्त दोन वेळा रणजी चषकावर नाव कोरता आलेय. 


पहिल्या डावात शार्दूलची भन्नाट फटकेबाजी - 


जेतेपदच्या सामन्यात मुंबईला पहिल्या डवत फक्त 224 धावांवर समाधान मानावे लागले. विदर्भाच्या माऱ्यापुढे मुंबईची अवस्था अतिशय खराब झाली होती. मुंबईची अवस्था एकवेळ 6 बाद 111 अशी दैयनीय झाली होती. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ हे दिग्गज स्वस्तात तंबूत परतले होते. पण त्याचवेळी शार्दूल ठाकूर संकटकाळात धावून आला. शार्दूल ठाकूर यानं झंझावती 75 धावांची खेळी केली. शार्दूलच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने सन्मानजनक धावसंख्या उभारली. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला.  विदर्भाचा डाव अवघ्या 105 धावांत संपुष्टात आला.  विदर्भाच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. शम्स मुलानी, तनुश कोटियन आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.