नवी दिल्ली : असं म्हणतात की, परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवून जाते, अनुभव देऊन जाते. पण, याच परिस्थितीला कधीही विसरुन चालत नाही. परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या ध्येयप्राप्तीच्या दिशेनं वाटचाल करण्याचा यशशिखरापर्यंतचा प्रवास हा कायमच इतरांसाठीही आदर्श प्रस्थापित करत असतो. जीवनात आलेल्या अशाच काहीशा कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढत आपल्या क्रिकेट कारकीर्दीत यशाच्या वाटेवर निघालेल्या एका युवा खेळाडूनं सध्या अनेकांची मनं जिंकली आहेत. यामागचं कारण आहे, त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय किंवा मग त्याची दानशूर वृत्ती.


विराट पुन्हा कर्णधारपदी येताच अजिंक्य रहाणेची लक्षवेधी प्रतिक्रिया


भारतीय क्रिकेट संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या (Ind Vs Aus) ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खऱ्या अर्थानं आपली वेगळी ओळख तयार करत क्रीडारसिकांच्या मनाचा ठाव घेणारा हा खेळाडू आहे ऋषभ पंत (rishabh pant). खेळपट्टीवर आक्रमक फलंदाजी आणि यष्टीरक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ऋषभची भावनिक बाजू नुकतीच समोर आली आहे. एका मुलाखतीमुळं याचा खुलासा झाला.


बीसीसीआयशी (BCCI) करार झाल्यापासून केली एक आगळीवेगळी सुरुवात....


एका मुलाखतीत खुलासा केल्याप्रमाणं, ऋषभ प्रत्येक मालिकेनंतर त्याची क्रिकेट किट बॅग गरजू आणि युवा खेळाडूंना दान करतो. बीसीसीआयशी करारबद्ध झाल्यापासून तो असं करु लागला आहे. याचबाबत सांगताना त्यानं उलगडा केला होता की, तारक सर त्याला फलंदाजी आणि यष्टीरक्षणासाठीचं सामान द्यायचे. बूट आणि बॅटही द्यायचे. आशिष नेहराही क्लबमध्ये बरंच सामान देत होते, ज्यामुळं ऋषभ आणि इतरही खेळाडूंना मदत मिळत होती. कारकिर्दीच्या अगदीच सुरुवातीच्या टप्प्यावर असताना त्याला अनेकांनीच मदत केली होती, सामान दिलं होतं अशा परिस्थितीत आता जेव्हा आपण इतरांना मदत करु शकू या स्थानी पोहोचलो आहोत तर मग यात हात आवरता का घ्यावा, अशाच वृत्तीनं तो प्रत्येक मालिकेनंतर क्रिकेट किट दान करतो.





कायम स्वत:वर विश्वास ठेवा


एक व्यक्ती म्हणून तुमच्या स्वत:वर विश्वास असला पाहिजे, अशा मतावर ऋषभ पंत ठाम आहे. तुम्ही जीवनात पुढे जात आहात याचा अर्थ तुमच्यात सुधारणा होत आहे. कठिण काळात मी हेच कर शिकलो. खेळावर अशा पद्धतीनं लक्ष केंद्रीत करा की, त्याव्यतिरिक्त तुम्हाला इतर सर्वच गोष्टींचा विसर पडेल, असं तो म्हणतो. सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळं अनेकदा या गोष्टींमध्ये अडचणी येतात पण, ऋषभनं मात्र यापासून स्वत:ला वेगळं केलं आहे.