मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांची कमतरता भरुन काढण्यासाठी भारताकडे वेगवान गोलंदाजीमध्ये मजबूत पर्याय उपलब्ध असल्याचं माजी कसोटीपटू झहीर खानने म्हटलं आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या काही सामन्यांना मुकावं लागणार आहे.


पण त्यांची जागा घेण्यासाठी ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर हे सक्षम असल्याचं झहीरने म्हटलं आहे. याशिवाय अष्टपैलू हार्दिक पंड्याचाही भारतीय संघात समावेश आहे.

भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यातली पहिली कसोटी एक ऑगस्टपासून बर्मिंगहॅममध्ये सुरु होईल.

झहीर खान म्हणाला की, "जे गोलंदाज खेळले, जसे की उमेश यादव चांगली कामगिरी करत आहेत. ईशांत सीनियर गोलंदाज आहे आणि त्याला पुढे येऊन नेतृत्त्व करावं लागेल. शमीचीही कामगिरी चांगली आहे. भुवनेश्वर आणि बुमराची कमतरता जाणवेल, पण तरीही भारताचा बेंच स्ट्रेंथ फार मजबूत आहे, असं मला वाटतं."