नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पण यावेळी भारतीय गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली. खासकरुन वेगवान गोलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. मात्र, तरीही पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला तसं अजिबात वाटत नाही.


शोएबच्या मते, 'भारताला वेगवान गोलंदाजांचा देश बनण्यासाठी अजूनही बराच वेळ लागेल.'

'बऱ्याच कालावधीनंतर भारताकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. यामध्ये इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्यासारखे खेळाडू आहेत.' असं अख्तर यावेळी म्हणाला.

पण हे भारताचे सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना अख्तर म्हणाला की, 'मी असं नाही म्हणणार, माझ्या मते ते हळूहळू नक्कीच सुधारणा करत आहेत. पण भारताला एक चांगल्या वेगवान गोलंदाजांचा देश होण्यासाठी आणखी बराच वेळ जावा लागेल.' असं शोएब म्हणाला.

'पाच वर्षापूर्वी मला असं वाटलं होतं की, वरुण अॅरॉन, उमेश यादव आणि मोहम्मद शमी परदेशी दौऱ्यावर भारतीय वेगवान गोलंदाजीचा ठसा उमटवतील. पण तसं झालं. अॅरॉनच्या फिटनेसचा प्रश्न कायम आहे. तर यादवने तुकड्या तुकड्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर कधी-कधी त्याची कामगिरी फारच वाईटही झाली आहे.' असंही अख्तर यावेळी म्हणाला.