दम्बुला : विराट कोहलीच्या टीम इंडियानं दम्बुलाच्या पहिल्या वन डेत श्रीलंकेचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


या सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 216 धावांत गुंडाळून निम्मी कामगिरी फत्ते केली होती. मग शिखर धवन आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 197 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

शिखर धवननं 90 चेंडूंत 20 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 132 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीनं 70 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 82 धावांची खेळी केली.

त्याआधी, अक्षर पटेल, केदार जाधव आणि यजुवेंद्र चहल या फिरकी त्रिकूटानं श्रीलंकेचा डाव 216 धावांत गुंडाळून भारताच्या विजयाचा पाया रचला. त्या तिघांच्या प्रभावी माऱ्यासमोर श्रीलंकेची दोन बाद 139 धावांवरून 216 धावांत घसरगुंडी उडाली.

भारताकडून अक्षर पटेलनं 34 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. केदार जाधवनं 26 धावांत दोन, तर यजुवेंद्र चहलनं 60 धावांत दोन विकेट्स काढल्या.