गॉल : गॉल कसोटीत शिखर धवन आणि पुजाराच्या दीड शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध तब्बल 600 धावांचा डोंगर रचला. पहिल्या दिवशी भारतानं 3 विकेट गमावून 399 धावांपर्यंत मजल मारली होती. तर दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 600 धावांवर आटोपला.


दरम्यान, कर्णधार विराट कोहली या डावात सपशेल अपयशी ठरला. तो फक्त 3 धावांवर बाद झाला. मात्र, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पंड्या यांनीही अर्धशतकं झळकावली तर अश्विननं देखील 47 धावा केल्या.

पहिल्या डावात नुवान प्रदिपनं सहा बळी घेतले तर कुमारानं 3 गडी बाद केले. मात्र, श्रीलंकेचे इतर गोलंदाज फार प्रभावी कामगिरी करु शकले नाही.

श्रीलंकेला डावाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर करुणारत्ने अवघ्या 2 धावांवर बाद झाला. उमेश यादवनं त्याचा बळी घेतला. सध्या थरंगा आणि गुणतिलके मैदानावर आहेत.  मोठी धावसंख्या उभारल्यानं भारतीय संघाला या सामन्यावर मजबूत पकड मिळवण्याची चांगली संधी आहे.