नवी दिल्ली : बिहारमधील राजकीय भूकंपाने देशाच्या राजकारणालाही वेगळं वळण लागल्याचं दिसतं आहे. पुढील महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात जेडीयूच्या खासदारांचा समावेश होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जेडीयूला 1 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्रिपद मिळू शकतं. इतकंच नाही तर मंत्रिपदाच्या उमेदवाराचा निर्णय घेण्याचा अधिकारही नितीश कुमार यांना देण्यात आल्याचं कळतं. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.

मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संरक्षण मंत्रालय आणि आणि अनिल माधव दवे यांच्या निधनानंतर पर्यावरण मंत्रालयं रिक्त आहेत. त्यांचा अतिरिक्त कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यामुळे ही पदं कोणाकडे जाणार यांची चर्चा रंगली आहे.

शिवसेनेला मंत्रिपद मिळणार?
शिवसेना हा एनडीएमधील सर्वात जुना मित्रपक्ष आहे. शिवसेनेचे 18 लोकसभा आणि 3 खासदार राज्यसभेत आहेत. जेडीयूच्या खासदारांची संख्या शिवसेनेपेक्षाही कमी आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेपेक्षा एक मंत्रिपदही जेडीयूला जास्त मिळालं, शिवसेनेसाठी ते अवमानकारक ठरु शकतं. जेडीयूला दोन मंत्रिपदं आणि शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद ही रचना शिवसेना कदापि सहन करणार नाही. त्यामुळे शिवसेनेचा मान राखला जाणार का, जेडीयूच्या निमित्ताने आणखी एखादं मंत्रिपद शिवसेनेला मिळणार का याची उत्सुकता आहे.