कोलकाता: कोलकाता कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने चार बाद १६५ धावांची मजल मारली आहे. कर्णधार दिनेश चंदीमल 13 तर यष्टीरक्षक डिकवेला 14 धावांवर खेळत आहेत.


या कसोटीत थिरीमने आणि मॅथ्यूजनं तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 99 धावांच्या भागिदारीनं ही कसोटी श्रीलंकेच्या बाजूनं झुकल्याचं चित्र होतं. पण उमेश यादवनं आधी थिरीमनेला बाद करून ही जोडी फोडली. मग त्यानं पाच धावांत मॅथ्यूजलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळं टीम इंडियाला या कसोटीत कमबॅक करण्याची अजूनही संधी आहे.

दरम्यान, श्रीलंकेकडून  थिरीमनेनं 51, तर मॅथ्यूजनं 52 धावांची खेळी उभारली. त्यामुळंच श्रीलंकेला तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी चार बाद 165 धावांची मजल मारता आली.

भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनी प्रत्येक 2 विकेट घेतल्या.

श्रीलंकेला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे.

भारताचा डाव 172 धावांत गुंडाळला

या कसोटीत टीम इंडियानं आदल्या दिवशीच्या पाच बाद 74 धावांवरून, सर्व बाद 172 अशी मजल मारली. चेतेश्वर पुजारानं दहा चौकारांसह 52 धावांची खेळी उभारून त्यात मोलाचा वाटा उचलला.

रिद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजानंही सातव्या विकेटसाठी ४८ धावांची झुंजार भागीदारी रचली. पण श्रीलंकेच्या प्रभावी माऱ्यासमोर भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

श्रीलंकेच्या सुरंगा लकमलनं चार फलंदाजांना माघारी धाडलं, तर दासून शनाका, दिलरुवान परेरा आणि लाहिरू गमगेनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

संबंधित बातमी

LIVE : भारताचा पहिला डाव 172 धावांत आटोपला