कोलकाता: विराट कोहलीनं कोलकाता कसोटीत कर्णधारास साजेशी खेळी करुन आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक साजरं केलं. त्याच्या या झुंजार खेळीनं टीम इंडियाला पराभवाच्या संकटातूनही वाचवलं.


विराट कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे अठरावं शतक ठरलं. वन डे सामन्यांच्या कारकीर्दीत विराटच्या खजिन्यात 32  शतकं आहेत.

कसोटीतील 18 + वन डेतील 32 अशी कोहलीची 50 शतकं आहेत.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आठव्या स्थानावर दाखल झाला आहे.

दरम्यान, कोलकाता कसोटीत टीम इंडियानं आपला दुसरा डाव आठ बाद ३५२ धावांवर घोषित केला आहे. त्यामुळं श्रीलंकेसमोर विजयासाठी २३१ धावांचं आव्हान आहे.

कोलकाता कसोटीत मधल्या फळीतील फलंदाजांनी साथ सोडल्यानंतर, कर्णधार विराट कोहलीने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत खिंड लढवली. इतकंच नाही तर कोहलीने शतकही झळकावलं.

विराट कोहली भुवनेश्वर कुमारच्या साथीने शतकाकडे कूच करत होता, मात्र त्याला एक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.

त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमीच्या साथीने  कोहलीने शतक पूर्ण केलं.

पाचव्या दिवशी खराब सुरुवात

भारतीय फलंदाजांनी पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात केलेल्या खराब फलंदाजीनं कोलकात्याच्या पहिल्या कसोटीला कलाटणी दिली. या कसोटीत आदल्या दिवशीच्या एक बाद 171  धावांवरून टीम इंडियाची उपाहाराला पाच बाद 251 अशी घसरगुंडी उडाली. उपहारानंतरही ठराविक वेळेने भारताचे फलंदाज बाद होत राहिले.

लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांना आदल्या दिवशीच्या धावसंख्येत मोठी भर घातला आली नाही, तर अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं एक खिंड लढवली म्हणून ही कसोटी अजून तरी भारतीय संघाच्या हातून निसटलेली नाही. पण पाचव्या दिवशी उपाहारापर्यंत टीम इंडियाच्या हाताशी केवळ 129 धावांचीच आघाडी होती.

लकमलची भेदक गोलंदाजी

श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने पहिल्या दिवसाप्रमाणे आज पाचव्या दिवशीही भेदक गोलंदाजी केली. लकमलने एकाच षटकात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला तंबूत धाडत भारताला चौथा धक्का दिला. पुजाराने 22 धावा केल्या, तर पहिल्या डावात अवघ्या 4 धावा करणाऱ्या रहाणेला दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 4 बाद 213 अशी झाली होती.

त्याआधी लकमलनेच सलामीवीर के एल राहुलच्या त्रिफळा उडवून लंकेला दुसरं यश मिळवून दिलं. राहुलने कालच्या त्याच्या वैयक्तिक धावसंख्येत 5 धावांची भर घालून 79 धावांवर बाद झाला.

दरम्यान भारताने आज एक बाद 171 धावांवरुन पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली.

चौथ्या दिवसाचा खेळ

लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी दिलेल्या 166 धावांच्या सलामीनं कोलकाता कसोटीत टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाचा भक्कम पाया रचला. त्यामुळंच भारतानं चौथ्या दिवसअखेर एक बाद 171 अशी दमदार मजल मारली होती.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांच्या वेळेत बदल

चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी लोकेश राहुल 73, चेतेश्वर पुजारा दोन धावांवर खेळत होता. शिखर धवनचं शतक अवघ्या सहा धावांनी हुकलं. त्यानं 116 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांसह 94 धावांची खेळी उभारली.


श्रीलंकेचा पहिला डाव

त्याआधी, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारच्या प्रभावी आक्रमणाला श्रीलंकेनं रंगाना हेराथच्या प्रतिहल्ल्यातून दिलेलं उत्तर सरस ठरलं. त्यामुळंच श्रीलंकेला पहिल्या डावात भारतावर 122 धावांची आघाडी घेता आली. शमीनं 88 धावांत चार आणि भुवनेश्वरनं शंभर धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून श्रीलंकेला रोखण्यासाठी शिकस्त केली. पण हेराथनं तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून श्रीलंकेला सर्व बाद 292 धावांची मजल मारून दिली. हेराथनं 105 चेंडूंत नऊ चौकारांसह ६७ धावांची खेळी उभारली.

संबंधित बातम्या

मैदानात पाय ठेवताच पुजाराचा मोठा विक्रम

श्रीलंकेला ऑलआऊट करण्यासाठी कठीण मेहनत घेतली : भुवनेश्वर

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांच्या वेळेत बदल