ओदिशा: भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर होणार आहे.


विराट कोहलीच्या अनुपस्थित वन डे नंतर आता ट्वेन्टी ट्वेन्टी संघाची धुरादेखील रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 1-0 तर वन डे मालिका भारतानं 2-1 अशी खिशात घातली होती.

त्यामुळे या दोन्ही मालिका विजयानंतर ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकादेखील जिंकण्याच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरेल.

दरम्यान, कर्णधार रोहित शर्माकडे आता सलामीसाठी शिखर धवनऐवजी लोकेश राहुलचा पर्याय आहे. शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली आहे.

महेंद्रसिंह धोनीसारखा तगडा फलंदाज मधली फळी सांभाळण्यास सज्ज आहे. त्याच्या जोडीला श्रेयस अय्यर, दीपक हुड्डासारखे युवा खेळाडू आहेत. मात्र हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक हे फलंदाजही संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवू शकतात.

गोलंदाजाची धुरा सांभाळण्यासाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थंपी, जयदेव उनाडकट असे पर्याय आहेत.

दुसरीकडे सलग 5 टी ट्वेण्टी सामने गमावलेल्या श्रीलंकन संघाची मदार उपुल थरंगा आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांच्यावर असेल. या दोघांशिवाय विकेटकीपर फलंदाज डिकवेलाकडूनही श्रीलंकेला अपेक्षा असतील.

तर सुरंगा लकमलकडे गोलंदाजीची धुरा असेल. त्याला नुवान प्रदीप, विश्वा फर्नांडोची साथ असेल.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुड्डा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थंपी, जयदेव उनाडकट