कटक : यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकीच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेवर पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात 93 धावांनी मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


टीम इंडियानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकेचा डाव अवघ्या 87 धावात आटोपला. यजुवेंद्र चहलनं आपल्या भेदक लेगस्पिन गोलंदाजीनं चार षटकात 23 धावा देत श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं.

चायनामन कुलदीप यादव आणि हार्दीक पंड्यानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर जयदेव उनादकटनं एक विकेट घेतली.

धोनीची करामत 

या सामन्यात खऱ्या अर्थानं हिरो ठरला तो महेंद्रसिंह धोनी. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यावेळी धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. धोनीनंही मोक्याच्या क्षणी 39 धावा करुन टीम इंडियाला 180 धावांपर्यंत मजल मारुन दिली.

181 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 87 धावांवर बाद झाला. यामध्ये धोनीचाही महत्त्वाचा वाटा होता. कारण या सामन्यात धोनीनं दोन स्टम्पिंग, दोन कॅच अशी कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

स्टम्पमागे कायमच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धोनीनं या सामन्यात तशीच कामगिरी केली. त्यानं यावेळी थिसारा परेरा आणि गुणरत्ने या दोघांनी स्टम्पिंग करत तंबूत धाडलं.

सुरुवातीपासूनच फटकेबाजी करणाऱ्या थरंगाचा अप्रतिम झेल पकडून धोनीनं सामना भारताच्या बाजूनं झुकवला. त्यानंतर परेराचाही धोनीनं एक सोपा झेल घेतला.

दरम्यान सुरुवातीला लोकेश राहुलचं दमदार अर्धशतक आणि धोनीच्या झटपट 39 धावांच्या जोरावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियानं 20 षटकात 3 बाद 180 धावांपर्यंत मजल मारली.

भारताचं श्रीलंकेसमोर 181 धावांचं आव्हान

नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं श्रीलंकेसमोर 181 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुलनं सलामीला येऊन दमदार फलंदाजी करताना 48 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 61 धावांची खेळी उभारली. त्यानं रोहित शर्मा, श्रेयस अय्यरच्या साथीनं पहिल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी  अनुक्रमे 38 आणि 63 धावांची भागीदारी रचली.

कटकमध्ये मैदानात बरंच दव असल्यानं चेंडू बॅटवर म्हणावा तसा येत नव्हता. अशावेळी चौथ्या क्रमांकावर आलेल्या धोनीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर ऐन मोक्याच्या क्षणी धावा करत भारताला 180 धावांपर्यंत मजल मारुन दिली. त्याला मनिष पांडेची देखील चांगली साथ मिळाली.

रोहित शर्मानं 17 तर श्रेयस अय्यरनं 24 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आलेल्या महेंद्रसिंग धोनी आणि मनिष पांडेनंही जलद अर्धशतकी भागीदारी साकारली. धोनीनं चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद 39 धावा फटकावल्या तर पांडेनं नाबाद 32 धावांची खेळी साकारली.