जोहान्सबर्ग : भारताच्या जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमारच्या प्रभावी माऱ्यानं दक्षिण आफ्रिकेला १९४ धावांत रोखण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळं जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेला सात धावांचीच नाममात्र आघाडी घेता आली.


या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बुमरा आणि भुवनेश्वरनं टिच्चून मारा केला. बुमरानं ५४ धावांत पाच, तर भुवनेश्वर ४४ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनं एकेक विकेट काढून त्यांना छान साथ दिली.

भारताच्या या प्रभावी आक्रमणासमोर कागिसो रबादा, हाशिम अमला आणि वरनॉन फिलॅण्डर हे तीनच फलंदाज नेटानं उभे राहिले. रबादानं ३० धावांची, अमलानं ६१ धावांची, तर फिलॅण्डरनं ३५ धावांची खेळी केली. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेला सात धावांची आघाडी घेता आली.

अमलाचा एकमेव अपवाद वगळला तर भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकी फलंदाजीला वारंवार हादरवलं. मारक्रम आणि एल्गर या सलामीच्या फलंदाजांपाठोपाठ त्यानं एबी डिव्हिलियर्सलाही स्वस्तात माघारी धाडलं. तर जसप्रीत बुमरानं फॅफ ड्यू प्लेसी आणि क्विन्टॉन डी कॉकचा काटा काढला.

दरम्यान, टीम इंडियाचा पहिला डाव काल १८७ धावात आटोपला होता. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दोघांनीही भारताच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावलं होतं. पण इतर फलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

संबंधित बातम्या :

टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 187 धावांवर आटोपला