आशिया चषकाचं विजेतेपद भारताकडे, मलेशियावर 2-1 ने मात
एबीपी माझा वेब टीम | 22 Oct 2017 07:19 PM (IST)
भारताकडून अंतिम सामन्यात रमणदीप सिंग आणि ललित उपाध्यायने एकेक गोल झळकावला.
ढाका : भारतीय हॉकी संघाने मलेशियावर 2-1 अशी मात करून आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. आशिया चषकाच्या इतिहासात भारताने विजेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताने याआधी 2003 आणि 2007 साली आशिया चषक जिंकला होता. यंदा ढाक्यात खेळवण्यात आलेल्या आशिया चषकावर भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. अंतिम फेरीत दाखल होण्याआधीच्या सहापैकी पाच सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता, तर दक्षिण कोरियाविरुद्धच्या एकमेव सामन्यात भारताला बरोबरीवर समाधान मानावं लागलं होतं. भारताकडून अंतिम सामन्यात रमणदीपसिंग आणि ललित उपाध्यायने एकेक गोल झळकावला.