मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या पाच वन डे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 282 धावांचं आव्हान दिलं आहे. 50 षटकात टीम इंडियाच्या 7 बाद 281 धावा झाल्या.


श्रीलंकेला त्यांच्या भूमीत चारीमुंड्या चीत करणारी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे.

मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांची खिल्लारी जोडी खरं तर ऑस्ट्रेलियाच्या फौजेत नाही. तरीही श्रीलंकेला श्रीलंकेत हरवण्यापेक्षा स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलियाला भारतात हरवणं हे कठीण आहे. त्यामुळेच पाच वन डे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियासमोरचं ऑस्ट्रेलियाचं आव्हान हे डोंगराएवढं मोठं आहे.

या मालिकेतला सलामीचा वन डे सामना चेन्नईत खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना एका जमान्यात भारतीय वातावरणात आणि भारतीय खेळपट्ट्यांवर खेळणं कठीण ठरायचं. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, अॅरॉन फिन्च आणि जेम्स फॉकनर यांच्यासारख्या आयपीएलचा मोठा अनुभव असलेल्या शिलेदारांना भारतीय खेळपट्ट्या आणि भारतीय वातावरणही आता परकं वाटत नाही. त्यामुळेच स्टीव्ह स्मिथची
ऑस्ट्रेलियन फौज टीम इंडियाला भारतातही कडवी टक्कर देऊ शकते. याच भारतात झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला 1-2 अशा निसटत्या विजयावर समाधान मानायला लावलं.

स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलिया संघाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आगामी मालिकेच्या दृष्टीनं खास पूर्वतयारी केली आहे. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून खेळलेला एस. श्रीराम हा ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाजीचा सल्लागार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाच्या चेन्नईतल्या नेट प्रॅक्टिससाठी श्रीरामनं के. के. जियास या चायनामन गोलंदाजाला आणि मुरुगन अश्विन या लेग स्पिनरला खास पाचारण केलं होतं. टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि लेग स्पिनर यजुवेंद्र चहल यांना खेळणं सोपं जावं म्हणूनच श्रीरामनं ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडून ही तालीम करून घेतली.

स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलिया संघाचं आव्हान कितीही तगडं असलं आणि त्यांनी भारत दौऱ्याची पूर्वतयारीही उत्तम केली असली तरी विराट कोहलीची टीम इंडियाही काही कच्च्या गुरुची चेला नाही.

कर्णधार विराट कोहलीसह भारताच्या मधल्या फळीत लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे आणि केदार जाधव यांच्यासारख्या रथीमहारथी फलंदाजांचा समावेश आहे. हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलू फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर आपली गुणवत्ता दाखवून देत आहे. उमेश यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांचा वेग टीम इंडियाच्या ताफ्यात आहेच, पण कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्या मनगटी फिरकीवरही विराट कोहलीचा विश्वास आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांची ताकद लक्षात घेता आगामी मालिकेत दोन्ही संघांकडून चुरशीचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण टीम इंडियानं पाच वन डे सामन्यांच्या मालिकेवर 5-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं, तर भारताला आयसीसी क्रमवारीतल्या तिसऱ्या स्थानावरुन अव्वल स्थानावर झेप घेता येईल. तसंच ऑस्ट्रेलियानं आयसीसी क्रमवारीतल्या दुसऱ्या स्थानावरुन आणखी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलं, तर कांगारूंना पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत किमान 4-1 असा विजय साजरा करावा लागेल.

विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्यापासून 2019 सालच्या विश्वचषकाच्या बांधणीची तयारी सुरु केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच वन डे सामन्यांची आगामी मालिकाही बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या त्याच उद्दिष्टाची पुढची पायरी असेल.