हैदराबाद: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी ट्वेण्टी सामना आज हैदराबादमध्ये खेळवण्यात येत आहे. गुवाहटीतील दुसरा सामना जिंकून, ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे. भारतीय संघाला आजचा सामना जिंकून 70 वर्षात नवा विक्रम रचण्याची संधी आहे. आजचा सामना जिंकला तर 70 वर्षात भारत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला तीनही फॉरमॅटमध्ये सलग चारवेळा हरवण्याचा विक्रम रचेल. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या मागील तीनही मालिकेत विजय मिळवला आहे. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात टी 20 मालिकेत 3-0 ने हरवलं होतं. त्यानंतर भारतातील कसोटी मालिका 2-1 ने जिंकली होती, मग आता नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला 4-1 ने धूळ चारली. भारताने आजचा सामना जिंकला, तर आयसीसी रँकिंगवरही परिणाम होईल. टी ट्वेण्टी रँकिंगमध्ये भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. जर भारताने हा सामना जिंकला, तर भारताचं रँकिंग सुधारणार नाही. मात्र ऑस्ट्रेलियाचा विजय झाला तर टीम इंडिया सहाव्या स्थानावर घसरेल. तर सहाव्या स्थानावरील ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर येईल. टी ट्वेण्टी रँकिंग
  • न्यूझीलंड (125)
  • पाकिस्तान (121)
  • वेस्ट इंडिज (120)
  • इंग्लंड (119)
  • भारत (116)
  • ऑस्ट्रेलिया (111)
संबंधित बातमी टी-20 मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज