बीसीसीआयने सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या मायदेशातील मालिकांची घोषणा केली . मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर या दौऱ्याची माहिती देण्यात आली.
सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या मायदेशातील या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वन डे सामने खेळवण्यात येतील. चेन्नई, बंगळुरु, नागपूर, इंदूर आणि कोलकात्यात हे सामने होतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20 सामने हैदराबाद, रांची आणि गुवाहाटीमध्ये खेळवण्यात येतील.
न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये तीन टी-20 सामने आणि तीन वन डे खेळवण्यात येतील. वन डे पुणे, मुंबई आणि कानपूरमध्ये होतील. तर दिल्ली, कटक आणि राजकोटमध्ये टी-20 सामने खेळवण्यात येतील.
नोव्हेंबरमध्ये भारत श्रीलंकेविरुद्ध कोलकात्यातून कसोटी मालिकेची सुरुवात करणार आहे. दुसरा कसोटी सामना नागपुरात होईल, तर तिसरा आणि अंतिम कसोटी सामना दिल्लीत खेळवला जाईल.
श्रीलंकेविरुद्धचे तीन वन डे सामने धर्मशाला, मोहाली आणि विशाखापट्टणम इथे खेळवले जातील. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात कोची किंवा तिरुवअनंतपुरममधील नवनिर्मित स्टेडिअममधून होईल. तर उर्वरित दोन सामने इंदूर आणि मुंबईत खेळवले जातील.