लंडन: विराट कोहलीची टीम इंडिया एजबॅस्टनपाठोपाठ लॉर्डस कसोटीतही चारीमुंड्या चीत झाली. इंग्लंडनं टीम इंडियाचा या कसोटीत एक डाव आणि 159 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडनं पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.


फलंदाजांची निराशाजनक कामगिरी, चुकीचा संघ, बोथट गोलंदाजी ही सर्व भारताच्या पराभवाची कारणं आहेत. आता इंग्लंड  आणि भारत यांच्यातील तिसरा सामना 18 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यातून सातत्याने अपयशी ठरणाऱ्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंना डच्चू मिळू शकतो.

यामध्ये पहिलं नाव आहे विकेटकीपर दिनेश कार्तिकचं. दुखापतीमुळे भारताचा पहिल्या पसंतीचा कसोटी विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या जागी दिनेश कार्तिकला भारतीय संघात स्थान मिळालं. अनुभवी कार्तिककडून भारताला अपेक्षा होती, मात्र ती आतापर्यंत तरी फोल ठरली.

दिनेश कार्तिकः 4 डावात केवळ 21 धावा

दिनेश कार्तिक दोन कसोटीत चार डावांमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र त्याला एकाही डावात मोठी खेळी करता आली नाही. चार डावात मिळून त्याला केवळ 21 धावा करता आल्या.

बर्मिंगहॅम कसोटीत खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात कार्तिक शून्यावर माघारी परतला. मग दुसऱ्या डावात त्याला कशातरी 20 धावा करता आल्या.

मग लॉर्ड्स कसोटीतही कार्तिकची हाराकिरी सुरुच होती. या कसोटीत कार्तिकला पहिला डावात 1 आणि दुसऱ्या डावात शून्यावर बाद केलं.

त्यामुळे नॉटिंगहॅम कसोटीत कार्तिकऐवजी ऋषभ पंतला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. 

मुरली विजय: दोन डावात दोनवेळा शून्य

विशिष्ट शैलीमुळे कसोटी संघात स्थान मिळवलेला मुरली विजयही या कसोटीत चमकदार कामगिरी करु शकला नाही. चारपैकी तीन डावात तर विजय अत्यंत वाईट खेळला. पहिल्या कसोटीत 20 आणि 6 धावा करणारा विजय, दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद झाला. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याच्याजागी पुन्हा शिखर धवन परतणार की काय हे पाहावं लागणार आहे.

के एल राहुल – 4 डावात 35 धावा

मधल्या फळीतील आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराच्या जागी के एल राहुलला टीम इंडियात स्थान मिळालं. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. राहुलमध्ये वेगवान धावा करण्याची तसेच वेळप्रसंगी मैदानात उभं राहून बॅटिंग करण्याची क्षमता आहे. मात्र दोन कसोटीच्या चार डावात त्याला केवळ 35 धावाच करता आल्या. त्यामुळे आता राहुलऐवजी त्रिशतकीवर करुण नायरला संधी मिळण्याची चिन्हं आहेत.

अजिंक्य रहाणेची कामगिरीही निराशाजनक

टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडूनही भारताला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र दोन कसोटीत तर त्या सपशेल फोल ठरल्या आहेत. रहाणेला पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात मिळून 17 धावाच करता आल्या. मग लॉर्ड्स कसोटीत रहाणे काही काळ मैदानात उभा राहिला, पण त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. रहाणेने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 18 आणि दुसऱ्या डावात 13 अशा मिळून 31 धावा केल्या.

संबंधित बातम्या 

पुढच्या कसोटीत खेळणार की नाही? विराट म्हणतो... 

चुकीचा संघ घेऊन मैदानात उतरल्याने पराभव : विराट कोहली 


आधी मैदानाची सफाई, नंतर रेडिओ विक्री, अर्जुनचं सर्वत्र कौतुक  


लॉर्ड्स कसोटीत भारताचा एक डाव आणि 159 धावांनी पराभव