नागपूर : विराट कोहलीच्या टीम इंडियाने नागपूरच्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने मालिका जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.


यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची मालिका झाली. यामध्ये भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियावर 3-2 ने मात केली. भारताने पहिल्यांदा 1986 आणि दुसऱ्यांदा 2013 साली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 55 सामने खेळले आहेत. यापैकी 24 सामन्यात भारताने विजय मिळवला, तर 26 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर पाच सामने अनिर्णित राहिले. नागपूर वन डेत भारताने विजय मिळवल्याने हा आकडा 26-25 असा झाला आहे.

भारतीय संघानं या विजयासह आयसीसीच्या वन डे सामन्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यामुळं कसोटी आणि वन डे या दोन्ही फॉरमॅट्समध्ये एकाचवेळी नंबर वन होण्याचा मान टीम इंडियाला मिळाला आहे.

भारताने नागपूरच्या वन डेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला नऊ बाद 242 धावांत रोखून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. मग रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं चौदावं शतक ठोकून भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

रोहितने 109 चेंडूंत 11 चौकार आणि पाच षटकारांसह 125 धावांची खेळी उभारली. त्याने अजिंक्य रहाणेच्या साथीनं 124 आणि विराट कोहलीच्या साथीनं 99 धावांची भागीदारी रचली.

अजिंक्य रहाणेनं 74 चेंडूंत सात चौकारांसह 61 धावांची खेळी केली. त्याआधी, भारताकडून अक्षर पटेलनं 38 धावांत तीन, तर जसप्रीत बुमरानं 51 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. केदार जाधव, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक विकेट काढली.