नॉर्थ साउंड: वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानं भारतानं 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0नं आघाडी घेतली आहे.


वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं 50 षटकात 4 गडी गमावून 251 धावांपर्यंत मजल मारली. धोनीनं अर्धशतक झळकावत नाबाद 78 धावा केल्या तर रहाणेनं 72 धावा केल्या. तर हाणामारीच्या षटकांमध्ये केदार जाधवनं 26 चेंडूत 40 धावा करत भारतला अडीचशेचा टप्पा गाठून दिला.

252 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 158 धावावर गारद झाला. फिरकीपटू कुलदीप यादव आणि आर अश्विननं यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, 79 चेंडूत 78 धावा आणि एक अप्रतिम स्टम्पिंग करणाऱ्या धोनीला मॅन द मॅच घोषित करण्यात आलं.