अहमदाबाद : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात मागच्या परभवाचा वचपा काढत इंग्लंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यासह विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. 


या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले. कोहलीच्या नावे आता टी20 सामन्यात सर्वाधिक अर्धशतकं बनवण्याचा विक्रम झाला आहे. त्यानं रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहितच्या नावे टी 20 मध्ये 25 अर्धशतकं आहेत तर विराटची 26 अर्धशतकं झाली आहेत.  


तसेच या अर्धशतकासह विराट टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. 


सर्वाधिक धावा करणारे जगातील पाच खेळाडू
विराट कोहली (भारत) - 3001 रन


मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) - 2839 रन


रोहित शर्मा (भारत) - 2773 रन


एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) - 2346 रन 


शोएब मलिक (पाकिस्तान) - 2335 रन


मागच्या सामन्यात केला होता लाजिरवाणा विक्रम 
Ind vs Eng टी20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात 14 व्या वेळेस विराट एक कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला. यानंतर विराट हा असा कर्णधार बनला आहे जो बहुतेक वेळा शून्यावर बाद झाला.  या विक्रमामध्ये विराटपूर्वी सौरव गांगुलीच्या नावाचा समावेश होता, जो कर्णधार म्हणून 13 वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यामागोमाग धोनी (11 वेळा), कपिल देव (10 वेळा) आणि मोहम्मद अझरुद्दीन (8 वेळा) यांच्याही नावाचा समावेश आहे.


पदार्पणाच्याच सामन्यात इशान किशनचं तुफानी अर्धशतक 
कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन या दोघांनी विजयी खेळी साकारली. कर्णधार विराट कोहलीने 46 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी साकारली. याशिवाय ईशान किशनने आपला पहिला सामना खेळत 32 बॉलमध्ये 56 धावा केल्या. भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन यानं रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात पदार्पणाच्याच खेळीत क्रीडारसिकांची मनं जिंकली. संघातील आपली निवड सार्थ ठरवत त्यानं निवड समितीलाही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली आहे.इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या टी20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इशान किशन यानं 28 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. चौकार आणि षटकारांची बरसात करत त्यानं विरोधी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. षटकाराच्याच सहाय्यानं त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं एकूण 32 चेंडूंमध्ये 56 धावांची प्रभावी खेळी करत सर्वांचीच दाद मिळवली.