Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसरा कसोटी सामना सात जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) मध्ये खेळला जाणार आहे. मात्र या तिसऱ्या सामन्यावर कोरोनामुळं संकट आलं आहे. कारण सिडनीत 31 डिसेंबरला 10 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. मागील दोन आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह केसेस वाढून 170 वर पोहोचल्या आहेत. एका रिपोर्टनुसार तिसरी कसोटी एससीजी वर प्रेक्षकांविना खेळली जाऊ शकते. ब्ल्यू माउंटेन, इलावारा या भागात कोविडचा प्रसार अधिक आहे. तर एससीजीपासून 30 किलोमीटर अंतरावरील बेराला आणि स्मिथफील्ड अलर्ट वर आहेत.


एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, मास्क घालणं आता अनिवार्य करण्याच्या चर्चा आहेत. तसंच सात तारखेपासून सुरु होणारा सामना प्रेक्षकांविना करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. मागील दोन आठवड्यात सिडनीत कोरोना केसेस शून्यावरुन 170 वर पोहोचल्या आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने ब्रॉडकास्टिंग स्टाफ कमी करण्याचा देखील निर्णय घेतलाय.

पहिल्या कसोटीत मानहानीकारण पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी केली आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी तामिळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला टीम इंडियात स्थान देण्यात आलं आहे. त्याआधी शार्दुल ठाकूरला मोहम्मद शमीच्या जागी दुसर्‍या कसोटी सामन्यात संघात स्थान देण्यात आलं होतं.  भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माही दुखापतीतून सावरला असून सिडनीमध्ये 14 दिवसांचा क्वॉरंटाईन काळ संपल्यानंतर तो संघात सामील झाला.