नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज भुवनेश्वर येथे एका कार्यक्रमात एलपीजी ग्राहकांसाठी मिस्ड कॉल सुविधा सुरू केली. जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना संपूर्ण भारतभरात रिफिल बुकिंगसाठी आणि भुवनेश्वर शहरात नव्या कनेक्शनसाठी 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉलच्या सुविधेचा वापर करता येईल.


आयव्हीआरएस सुविधेच्या तुलनेत मिस्ड कॉलचे काही फायदे खालीलप्रमाणे


- जलद नोंदणी, ग्राहकांना फोनवर जास्त काळ प्रतीक्षा करावी लागत नाही.
- आयव्हीआरएस कॉल सुविधेमध्ये लागू असलेल्या सामान्य कॉल चार्जेसच्या तुलनेत ग्राहकांना कोणतेही कॉल शुल्क लागू होत नाही.
- ज्या ग्राहकांना आयव्हीआरएस सुविधेची माहिती नसते किंवा ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा वापर करताना अडचणी येतात त्यांना मिस्ड कॉलद्वारे रिफिलची नोंदणी सहज करता येते.
- ग्रामीण भागातील ग्राहकांचे जीवन सुकर होईल.


आयव्हीआरएस सिस्टममध्ये अडचण येणाऱ्यांसाठी आणि वृद्धांसाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी द्वितीय श्रेणी ग्लोबल-ग्रेड प्रीमियम ग्रेड पेट्रोल (ऑक्टेन 100) देखील सादर केलं. इंडियन ऑईल यांची एक्सपी -100 ब्रँडखाली विक्री करेल. या वेळी प्रधान म्हणाले की गॅस एजन्सी आणि वितरकांनी एलपीजीची डिलिव्हरी एका दिवसात ते काही तासात केली पाहिजे याची खात्री करुन घ्यावी. एलपीजीच्या बाबतीत देश बराच पुढे गेला आहे. 2014 च्या पहिल्या सहा दशकात एलपीजी कनेक्शन सुमारे 13 कोटी लोकांना उपलब्ध करुन देण्यात आले. गेल्या सहा वर्षांत हा आकडा 30 कोटींवर पोहोचला आहे, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.