नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीस सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला 251 धावांचा आव्हान दिलं आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहलीची शतकीय खेळी महत्त्वपूर्ण ठरली.


विराट कोहलीनं नागपूरच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या कारकीर्दीतलं 40 वं शतक झळकावलं. विराट फलंदाजीला उतरला, त्यावेळी भारताच्या डावातलं दुसरं षटक सुरू झालं होतं आणि भारतीय धावफलकावर एक बाद शून्य अशी बिकट स्थिती होती. त्यानंतर विराटनं लौकिकास साजेसा खेळ करत भारताला 250 धावांपर्यंत मजल मारुन दिली.


विराटनं 120 चेंडूंत 116 धावांची खेळी केली, यात 10 चौकारांचा समावेश होता. त्यानं विजय शंकरच्या साथीनं रचलेल्या 81 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला आकार दिला. मग विराट आणि रवींद्र जाडेजानं सातव्या विकेटसाठी भारतीय डावात 67 धावांची भर घातली. याच दोन भागिदाऱ्यांनी टीम इंडियाला 250 धावांचा पल्ला गाठून दिला. विजय शंकरनं 46, तर रवींद्र जाडेजानं 21 धावांची खेळी उभारली.


विराट कोहलीनं नागपूरच्या एकदिवसीय सामन्यात झळकावलेल्या शतकानं सर्वाधिक शतकांची शर्यत आणखी चुरशीची बनवली. विराट कोहलीचं एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतलं हे 40 वं शतक होतं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमापासून तो आता केवळ नऊ शतकं दूर आहे. तसेच तिसऱ्या क्रमाकांवरच्या रिकी पॉन्टिंगपेक्षा विराटच्या खजिन्यात आता 10 शतकं अधिक आहेत.