World Cup 2019 : ...म्हणून सेमीफायनल सामन्यात धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला नाही : रवी शास्त्री
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2019 10:17 PM (IST)
विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडसोबत झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री पहिल्यांदाच माध्यमांशी बोलले.
getty image
लंडन : विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडसोबत झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री पहिल्यांदाच माध्यमांशी बोलले. शास्त्री म्हणाले की, संघात चौथ्या नंबरवर मजबूत फलंदाज नसणे ही टीमची नेहमीच डोकेदुखी होती. सेमीफायनलच्या सामन्यातदेखील चौथ्या नंबरवर भरवशाचा फलंदाज नसल्यामुळे सामन्यावर मोठा परिणाम झाला. रवी शास्त्री इंडियन एक्स्प्रेस या इँग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, मधल्या फळीत एका मजबूत फलंदाजाची संघाला आवश्यकता होती. के. एल. राहुल आमच्याकडे चांगला पर्याय आहे. परंतु शिखर धवन जखमी झाल्यानंतर तो सलामीला खेळू लागला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरील खेळाडूची कमी निर्माण झाली. त्यानंतर विजय शंकरला संधी देण्यात आली. परंतु त्यालादेखील जखमी झाल्यामुळे मायदेशी परतावे लागले. त्यानंतर शास्त्री यांना विचारण्यात आले की, धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला का आला नाही? यावर उत्तर देताना शास्त्री म्हणाले की, धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला न येणं हा टीमचा निर्णय होता. सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला होता. लोकांना वाटतं की, त्याने चौथ्या क्रमांकावर यायला हवं होतं. परंतु तसं केलं असतं तर कदाचित तो लगेच बाद झाला असता. सेमीफायनलमधील पराभवाबद्दल रोहित शर्मा म्हणतो... शास्त्री म्हणाले की, धोनी चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरला असता, तर लक्ष्य पार करणं अधिक अवघड गेलं असतं. सामन्याच्या उत्तरार्धात संघाला धोनीच्या अनुभवाची जास्त आवश्यकता होती. धोनी जबरस्त फिनिशर आहे. त्यामुळे धोनीचा फिनिशर म्हणूनच वापर व्हायला हवा. तसे न करणे ही खूप मोठी चूक ठरली असती. याबाबत संघाची स्पष्ट भूमिका होती. आम्ही तेच केलं. धोनीच्या निवृत्तीचा सस्पेन्स कायम, वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही? धोनी निवृत्ती केव्हा घेणार? | व्हिडीओ पाहा