मुंबई : अंडर-19 संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरलं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी आपण तणावात होतो अशी कबुली प्रशिक्षक राहुल द्रविडने दिली. पण हा तणाव आयपीएल लिलावामुळे होता असंही द्रविड म्हणाला.


पण भारतीय संघाने चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक पटकावला आणि राहुल द्रविडने सुटकेचा निश्वास सोडला.

या संपूर्ण प्रकाराबाबत बोलताना द्रविड म्हणाला की, 'आयपीएलच्या लिलावादरम्यान, एक आठवडा तणावपूर्ण होता. पण याचं श्रेय मुलांना जातं. आयपीएल लिलावानंतर मुलं सरावासाठी परत आली आणि त्यांनी अक्षरश: जीव ओतला. पण त्या तीन दिवसांमध्ये मी थोडा चिंतेत होतो.' असं द्रविड म्हणाला.

दरम्यान, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. काल (सोमवार) भारतीय संघ मुंबईत परतल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.