मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाबाबत सुरु झालेल्या वादावर अखेर रिलीजनंतर पडदा पडला. मात्र हा धुरळा शमतो न शमतो, तोच आणखी एक ऐतिहासिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' विरोधात राजस्थानात आंदोलन करण्यात आलं. ऐतिहासिक तथ्यांमध्ये बदल केल्याचा आरोप करत मणिकर्णिका चित्रपटाविरोधात निदर्शनं करण्यात आली. सर्व ब्राम्हण महासभेने या चित्रपटात इतिहासाचं विद्रुपीकरण केल्याचा दावा केला आहे.
'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट 19 व्या शतकातील झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यावेळी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीशी लढा या चित्रपटात दाखवला जाणार आहे. मात्र चित्रपटात लक्ष्मीबाई आणि एका ब्रिटीश व्यक्तीमध्ये प्रेमसंबंध दाखवल्याच्या आरोपावरुन वादाची ठिणगी पडली आहे.
सर्व ब्राम्हण महासभेचे अध्यक्ष सुरेश मिश्रा यांनी सोमवारी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. 'राजस्थानमध्ये या सिनेमाचं शूटिंग होत आहे. तिथल्या काही मित्रांनी आणि ओळखीच्या व्यक्तींनी आम्हाला ही माहिती दिली.' असा दावा मिश्रांनी केला. निर्मात्यांना पत्र लिहून आपण सिनेमाचे लेखक, ज्या इतिहासतज्ज्ञांशी चर्चा केली त्यांची नावं आणि गाण्यांचे तपशील मागवले असल्याचंही मिश्रा म्हणाले. मात्र कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यात काळंबेरं असण्याची शंका मिश्रांनी व्यक्त केली.
चित्रपटात कोणतेही प्रेमाचे सीन्स नसल्याची माहिती कमल जैन यांनी दिली आहे. राणी लक्ष्मीबाई अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व असून आपण त्यांची कथा काळजीपूर्वक हाताळल्याचंही ते म्हणाले. कोणताही आक्षेपार्ह भाग चित्रीत केला नसल्याचा दावा जैन यांनी केला.
क्रिश जगरलामुडी दिग्दर्शित मणिकर्णिका चित्रपटाची निर्मिती कमल जैन आणि झी स्टुडिओने केली आहे. कंगनासोबतच निहार पांड्या, सोनू सूद, अंकिता लोखंडेही या चित्रपटात झळकणार आहेत. 27 एप्रिल 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र तो आता 3 ऑगस्ट 2018 रोजी रिलीज होईल.