मुंबई : 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ईडन गार्डन्सवरील (2001) कसोटी सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मण (281 धावा) आणि राहुल द्रविड (180 धावा) यांनी विक्रमी 376 धावांची भागीदारी रचली होती. या भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला. सलग 16 कसोटी सामन्यात विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 17 व्या सामन्यात भारताने रोखलं. फॉलोऑनच्या दबावातून सावरत ह्या कसोटीला सर्वात अविस्मरणीय कसोटीमध्ये नेऊन ठेवलं.


"पण या कसोटीत दमदार कामगिरी करण्याची प्रेरणा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉकडून मिळाली होती," असं राहुल द्रविडने सांगितलं. "या  ऐतिहासिक खेळीच्या आधी तत्कालीन कर्णधार स्टीव्ह वॉने मला डिवचलं होतं. स्टीव्ह वॉची स्लेजिंगच माझ्या दमदार कामगिरी प्रेरणा बनली," असं राहुल द्रविड म्हणाला.

काही महिन्यांपूर्वीच्या कार्यक्रमात 'द वॉल' म्हणाला होता की, "त्या मालिकेत आणि त्याआधी मी धावांसाठी सातत्याने संघर्ष करत होतो. ऑस्ट्रेलियाविरोधातील मुंबई कसोटीतही मी फ्लॉप ठरलो. तर कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावातही मी धावा केल्या नव्हत्या. यामुळे संघ व्यपस्थापनाने माझ्या फलंदाजी क्रमात बदल केले होते आणि मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलो. जेव्हा दुसऱ्या डावात मी फलंदाजीसाठी मैदानात आलो, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ म्हणाला की, राहुल आता 6 नंबरवर आला आहे. पुढच्या सामन्याचं काय? 12 व्या नंबरवर दिसणार?"

द्रविडने सांगितलं की, "त्यावेळी माझ्याकडे भूतकाळ किंवा भविष्याबाबत विचार करण्याची संधी नव्हती. मी त्या खेळीवर लक्ष केंद्रीत केलं. तसंही कोणत्याही क्रिकेटरला एका वेळी एकाच बॉलवर फोकस करण्याचा वेळ असतो. जेव्हा माझी ही खेळी संपली, त्यावेळी मी 180 धावा केल्या होत्या."

"या कसोटीत एक वेळ अशी होती की, टीम इंडियासमोर फॉलोऑनचं संकट होतं, पण आता कांगारुंचा संघ दबावात आला होता. शेवटी आम्ही हा सामना जिंकला. त्यानंतर पुढचा सामना जिंकून मालिकाही आपल्या नावावर केली. सलग 16 कसोटी सामने जिंकल्यानंतर भारताकडून एकापाठोपाठ एक दोन सामने गमावून स्टीव्ह वॉने मालिकाही गमावली. भारताची कामगिरी पाहून ऑस्ट्रेलियन संघही आश्चर्यचकित झाला," असंही राहुल द्रविडने सांगितलं.

बीसीसीआयकडून लक्ष्मण-द्रविडला सलाम
बीसीसीआयनेही ट्विटरवर पोस्ट शेअर करुन लक्ष्मण-द्रविडला सलाम केलं. "2001 मध्ये याच दिवशी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या भागीदारीमुळे कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील कसोटीत भारताने ऐतिहासिक कमबॅक केलं," असं बीसीसीआयच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.