बर्मिंगहॅम : एजबॅस्टन ग्राऊंडवरील भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अत्यंत रोमांचक स्थितीत आहे. भारताला विजयासाठी 84 धावांची गरज आहे, तर दुसरीकडे इंग्लंड विजयापासून पाच विकेट्स दूर आहे. गोलंदाजांमुळे भारताला विजयाची संधी चालून आली आहे.


एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणलं. यामध्ये वेगवान गोलंदाज इशांत शर्माचं सर्वात मोठं योगदान होतं. त्याने पाच विकेट्स घेत इंग्लंडचा डाव स्वस्तात आटोपण्यात योगदान दिलं.

गोलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर इशांत शर्मा आता फलंदाजीसाठीही सज्ज आहे. आपल्याला फलंदाजीचा आत्मविश्वास असल्याचं इशांत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितलं.

''मी आत्ताच काऊंटी क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकलं होतं, ज्याचा आत्मविश्वास अजूनही आहे. मात्र अपेक्षा आहे, की याची गरजच पडणार नाही. विराट आणि दिनेश कार्तिक भारतीय संघाला विजय मिळवून देतील,'' असं इशांत शर्मा म्हणाला.

इशांत शर्माने भारतीय संघाचं कौतुकही केलं. ''त्याने (विराटने) आपल्या खेळाडूंवर जो विश्वास दाखवलाय, तो महत्त्वाचा आहे. तो खेळाडूंना नेहमीच सकारात्मक ऊर्जा देतो. सर्वांना माहिती आहे, की तो किती प्रोफेशनल क्रिकेटर आहे, जो नेहमीच काहीतरी खास करण्याच्या प्रयत्नात असतो,'' असंही इशांत म्हणाला.